प्रशांत केणी

मुंबई : रमाकांत आचरेकर, अशोक मंकड आणि पॉली उम्रीगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे शिकलो, त्यातून माझी प्रशिक्षकाची शैली निर्माण झाली. त्यामुळे हे यश मुंबईच्या ‘खडूस’ वृत्तीचेच आहे, अशा शब्दांत रणजी करंडक विजेत्या मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘‘खेळासाठी बांधिलकी आवश्यक असते, कोणतीही तडजोड करू नये, हे आचरेकर आणि मंकड नेहमी सांगायचे. मी कोणत्याही संघाला हेच दिशादर्शन करतो,’’ असे पंडित यांनी सांगितले. पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून हे सहावे रणजी जेतेपद पटकावले आहे. मुंबईला तीनदा (२००२-०३, २००३-०४, २०१५-१६), विदर्भाला दोनदा (२०१७-१८, २०१८-१९) आणि आता मध्य प्रदेशला प्रथमच जेतेपद मिळवून देणाऱ्या पंडित यांच्या यशाबाबत आणि मार्गदर्शन शैलीबाबत केलेली खास बातचीत-

’ विदर्भ, मध्य प्रदेश अशा अपरिचितांच्या संघांना तुम्ही कसे काय रणजी विजेते केले?

जिंकण्यासाठीच खेळायचे, हे संस्कार मुंबईत माझ्यावर घडवले गेले आहेत. मुंबईकडे चांगले क्रिकेटपटू होते आणि आहेत. पण तब्बल ४१ वर्षे रणजी करंडकावर वर्चस्व गाजवणाऱ्या या मुंबईच्या यशाचे नेमके कारण काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. मुंबईने बरेच फलंदाज तयार केले. माझ्या पिढीपुढे सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा आदर्श होता. संघ कोणताही असो, त्यांच्याकडे खेळायची गुणवत्ता, कौशल्य असतेच. परंतु एकजुटीने जिंकण्याची वृत्ती यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते.

’ रणजी स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून तुम्ही मिळवलेल्या यशाचे रहस्य काय?

आपण निकाल म्हणून पाहतो. प्रशिक्षक पंडित यांनी हे यश मिळवले, असे म्हणतात. परंतु काही घटना विधिलिखित असतात. शिस्त हीच माझी प्रमुख ओळख आहे. याचप्रमाणे क्रिकेटपेक्षा मोठा कुणी नाही, हेच मला शिकवण्यात आले आहे, तेच मी शिकवतो. याचप्रमाणे संघटनेच्या धोरणांचा पूर्णत: आदर करतो.

’ यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले?

मुंबईचा खडूस क्रिकेटपटू बनण्यासाठी आम्हाला गुरू आचरेकर यांनी उत्तमपणे शिकवले. सचिन तेंडुलकर, बलिवदर संधू, प्रवीण अमरे असे अनेक क्रिकेटपटू या क्रिकेट विद्यापीठातून तयार झाले. ते कधी बसच्या तिकिटावर खेळाडूंची वैशिष्टय़े लिहायचे, तर कधी गुपचूप खेळाडूचे निरीक्षण करायचे. खेळपट्टी कशी आहे, त्यावर कोणते फटके खेळता येतील, हे तंत्र आचरेकर सरांकडूनच शिकलो. योग्य वयात मफतलालकडून खेळायला लागलो. त्याचा अतिशय फायदा झाला. मंकड, ब्रिजेश पटेल, योगराज सिंग यांच्याबरोबर खेळायची संधी मिळाली. तिथे कर्णधार मंकड यांच्याकडून रणनीती, योजना आखायला शिकलो. यष्टीरक्षण करताना मंकड यांच्या प्रत्येक चालीचा मी विचार करायचो. मंकड फक्त कर्णधार नसायचे, तर ते संघ सांभाळायचे. उम्रीगर यांनी खेळपट्टीबाबतचा माझा अभ्यास समृद्ध केला. मुंबईच्या ड्रेसिंग रूमचाही माझ्या यशात महत्त्वाचा वाटा आहे. गावस्कर, वेंगसरकर, संदीप पाटील, एकनाथ सोलकर, करसन घावरी यांनीसुद्धा मला अनेक धडे दिले.

’ गावस्कर यांचा कोणता सल्ला तुमच्या कारकीर्दीत महत्त्वाचा ठरला?

माझ्या पहिल्या रणजी स्पर्धेप्रसंगी मी गावस्कर यांना एक प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘‘सामना पाहा, सगळे शिकशील’’ असे निर्देश दिले. त्या वेळी मला वाईट वाटले. पण कालांतराने त्यांचे म्हणणे अमलात आणल्यावर त्याचे महत्त्व पटले. आता मी हाच सल्ला खेळाडूंना देतो.

’ मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने कशा प्रकारे पाठबळ दिले?

मला संघटनेकडून सांगण्यात आले की, तुम्ही रणजी स्पर्धेसाठी प्रशिक्षक आहेच. पण अन्य वयोगटांच्या संघ बळकट करण्यासाठीही तुम्ही लक्ष घाला. मग येथील पदाधिकाऱ्यांनी या दृष्टीने आवश्यक मुभा मला दिली. विविध निवड समित्यांच्या बैठकाही उत्तम वातावरणात संपायच्या. त्यामुळे मध्य प्रदेशच्या यशात संघटनेचे पाठबळसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही ४०० दिवस शिबीर केले. त्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांचाही या यशात वाटा आहे. बाद फेरीसाठी आम्ही २० दिवस आधीच बंगळूरुत पोहोचलो.

’ मध्य प्रदेशच्या खेळाडूंमध्ये कशा प्रकारे आत्मविश्वास निर्माण केला?

संघातील सर्व खेळाडू एका लक्ष्यासाठी एकाच दृष्टिकोनातून खेळतात, तेव्हाच तो संघ यशस्वी ठरतो. मध्य प्रदेशचा क्रिकेटचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. सय्यद मुश्ताक अली, चंदू सरवटे यांच्यासारखे गाजलेले खेळाडू हे मध्य प्रदेशातून घडले आहेत. मी खेळाडूंपुढे हाच इतिहास मांडला. त्यातून प्रेरणा घेत तुम्हीसुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती करू शकता, हा विश्वास निर्माण केला.

’ संघातील कोणत्या खेळाडूंना यशाचे श्रेय द्याल?

आदित्य श्रीवास्तवने प्रथमच नेतृत्व करतानाही दडपण सांभाळत प्रत्येक प्रश्न उत्तम हाताळला. रजत पाटीदार, शुभम शर्मा, यश दुबे यांनी अप्रतिम फलंदाजी केली. कुमार कार्तिकेय, ईश्वर पांडे यांनी उत्तम गोलंदाजी केली. वेंकटेश अय्यर, आवेश खान भारतीय संघात आहेत, तर पुनीत दाते, कुलदीप सेन, अर्शद खान दुखापतीमुळे अंतिम फेरीसाठी संघात नव्हते. तरीही आम्ही यश मिळवू शकलो.

इंदूरमध्ये दिवाळी!

इंदूरमध्ये दिवाळीचेच वातावरण आहे. आम्ही विमानतळावरून बाहेर आलो, तेव्हा शेकडो चाहते ढोल-ताशा, पुष्पवर्षांव यांच्यासह आमच्या स्वागतासाठी सज्ज होते. यातून बाहेर पडताना आमची दमछाक झाली. पोलीस बंदोबस्तातच आम्ही होळकर स्टेडियममध्ये पोहोचलो. प्रकाशझोत आणि चाहत्यांनी ते दिपून गेले होते. या प्रवासात आणि स्टेडियममधील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे इंदूरमध्ये दिवाळी असल्याचेच जाणवत होते, असे पंडित यांनी सांगितले.