भारतास लॅन्को सुपरसीरिज हॉकीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात शुक्रवारी अपयश आले. यजमान ऑस्ट्रेलियाने त्यांचा ४-३ असा पराभव केला.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताने कर्णधार सरदारासिंगच्या गोलद्वारे आघाडी घेतली होती. मात्र त्यांची ही आघाडी अल्पकाळ ठरली. ऑसी संघाच्या जे. बोयनी याने गोल करीत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या. मध्यंतरास एक मिनिट बाकी असताना बोयनी याने स्वत:चा व संघाचा दुसरा गोल केला. तथापि दानिश मुस्तफा या भारतीय खेळाडूने गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात कांगारूंनी पहिल्यापासूनच आक्रमण केले. त्यांच्या व्हिटन याने गोल करीत संघास आघाडीवर नेले. त्यानंतर भारतानेही जोरदार चाली केल्या. अखेर गुरविंदरसिंग चंडी याने डाव्या हाताने सुरेख फ्लिक करीत गोल नोंदविला. सामन्याची शेवटची पाच मिनिटे बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेन्ट मिटॉनने गोल करीत संघास ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.