वर्ष २००३… स्थळ – दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन मैदान… क्रिजवर सचिन आणि सेहवाग… बॉल रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरच्या हाती… आणि त्या दिवशी जो इतिहास घडला त्याची आजही त्याच त्वेशानं भारतीय चाहते पाकिस्तानला आठवण करून देतात… तोच हा… “बाप बाप होता है…”चा किस्सा…

भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना असो… तो युद्धासारखाच खेळला जातो. ही क्रिकेटची परंपरा आहे. आजही ती कायम आहे. असंच युद्ध २००३ सालच्या वर्ल्डकपमध्ये रंगलं होतं. दिवस होता १ मार्चचा. पाकिस्ताननं सईद अन्वरच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर भारताला २७४ धावांचं आव्हान दिलं होतं. वसिम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर असे ‘फास्ट अँड फ्युरिअस’ गोलंदाच पाकिस्तानच्या ताफ्यात होते आणि त्यामुळे हे आव्हानही भारतासाठी डोंगराएवढं होतं. पण… भारताच्या हाती होतं सचिन नावाचं महाअस्त्र. सोबत होता वीरेंद्र सेहवाग. त्याच दिवशी हा “बाप बाप होता है… आणि बेटा-बेटा”चा इतिहास घडला.

काही दिवसांनी सेहवागनं हा इतिहास सगळ्यांना सांगितला. एका पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानचा अख्खा संघ समोर बसलेला असताना सेहवागनं हा किस्सा सांगितला… तो म्हणतो.. “आम्ही पाकिस्तानच्या विरोधात खेळत होतो. शोएब अख्तर बॉलिंग करत होता. मला पाहून तो थकून गेला होता. त्याला वाटलं तो मला शिव्या देईल. मी चिडेल. अन् आऊट होईल. मग त्यानं राउंड द विकेट बॉलिंग करायला सुरूवात केली. प्रत्येक बॉलनंतर तो मला उचकवायचा. हुक मारून दाखव… असं म्हणायचा. एका ओव्हरनंतर मला वाटलं आता हा अशीच गोलंदाजी करत राहणार. मी त्याला म्हटलं, नॉन स्ट्रायकर एंडवर तुझा बाप उभा आहे त्याला असाच चेंडू टाक.. तो मारून दाखवेन. तिकडे सचिन होताच. दुसऱ्या ओव्हरमध्ये शोएब अख्तरनं सचिनला बाउंसर टाकला, तेव्हा सचिननं सिक्सर लागवला. तेव्हा मी त्याला (अख्तरला) म्हटलं… बेटा बेटा होता आणि बाप बाप होता है…”

हा किस्सा मैदानावर जेव्हा घडला त्यानंतर सचिननं पाकिस्तानच्या भात्यातील वसिम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार युनूस यांच्यासारखे धारदार बाण निष्प्रभ केले. भारतानं पहिल्या ३२ चेंडूंमध्ये ५० धावा तडकावल्या. एका खुन्नसमधून अख्खा सामना भारतानं जिंकून दाखवला. सचिननं या सामन्यात ७५ चेंडूंमध्ये ९८ धावाही ठोकल्या. भारतानं हा सामना ६ गडी राखून जिंकला.