भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अनुप नारंग यांचे स्पष्ट मत

क्रिकेटसारख्या खेळाला भारतात अतिप्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे अन्य खेळ मागे पडत आहेत, असे बोलले जाते. पण भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अनुप नारंग यांना मात्र तसे वाटत नाही. बॅडमिंटन हा खेळ क्रिकेटपेक्षा अजूनही तीन दशके पिछाडीवर असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

‘‘तीस वर्षांपूर्वी जिथे क्रिकेट होते, तिथे सध्या बॅडमिंटन आहे. मुंबईला क्रिकेटचे माहेरघर म्हटले जाते. त्याचबरोबर पूर्वी बेंगळूरु आणि दिल्लीमध्येही क्रिकेट खेळले जात होते. पण त्यानंतर क्रिकेटचा प्रसार झाला आणि छोटय़ा शहरांमधून क्रिकेटपटू यायला सुरुवात झाली. महेंद्रसिंग धोनी हे त्याचे मोठे उदाहरण आहे. खेळाचा भारतातील छोटय़ा गावांमध्येही प्रसार व्हायला हवा, हे ध्येय ठेवूनच ही प्रीमिअर बॅडमिंटन लीग आयोजित करण्यात येत आहे,’’ असे नारंग म्हणाले.

एकीकडे या लीगच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये बॅडमिंटनचा विकास व्हावा असे असोसिएशनला वाटत असले तरी त्यांना चाहत्यांचा प्रतिसाद मात्र चांगला मिळताना दिसत नाही. ही गोष्ट नारंग यांनीही मान्य केली.

याबाबत ते म्हणाले की, ‘‘काही शहरांमध्ये लीगला चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. पण चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद कसा लाभेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील  आहोत.’’.

महिला दुहेरीचा समावेश व्हायला हवा!

‘‘या लीगमध्ये महिला दुहेरीचा समावेश असायला हवा, असे वाटत आहे. आता पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी या प्रकारांचा आतापर्यंत आम्ही लीगमध्ये समावेश केला होता. पण यापुढे महिला दुहेरीचाही विचार करून पाचही प्रकार खेळवण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये समस्या फक्त एवढीच आहे की, देशामध्ये महिला दुहेरीच्या जोडय़ा फार कमी आहेत,’’ असे नारंग यांनी सांगितले.

लीगमुळे युवा खेळाडूंना फायदा!

‘‘पीबीएलमध्ये जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभाग होत आहेत. पुरुष आणि महिला विभागांवर नजर फिरवली तर या लीगमध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल १० खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. या गोष्टीचा फायदा भारतातील युवा खेळाडूंना नक्कीच होईल. कारण या अव्वल खेळाडूंबरोबर सराव करून संवाद साधून त्यांना कमी वयात जास्त शिकता येईल,’’ असे नारंग म्हणाले.