कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे मंगळवारी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाने मायदेशी स्वागत करण्यात आले. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सिंधूचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने यावेळी कांस्यपदकाची कमाई करताना ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे (बाइ) सचिव अजय सिंघानिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिंधूचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधूसह प्रशिक्षक पार्क टाय-संगसुद्धा उपस्थित होते. आई पी. विजयाने सिंधूला यावेळी कडाडून आलिंगन देतानाच मुलीने देशासह कुटुंबाचे नाव उज्ज्वल केल्याचे मनोगत व्यक्त केले.

‘‘येथील वातावरण पाहून मी भारावून गेली आहे. माझ्यासाठी हा दिवस फार अविस्मरणीय असून तुम्ही सर्वांनी सातत्याने पाठिंबा दर्शवल्यामुळे मी तुमचे आभार मानते,’’ असे सिंधू म्हणाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना भेटणार आहेत. त्यावेळी पदक विजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे समजते.