टोक्यो ऑलिम्पिकच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर कुस्तीपटू बजरंग पुनियाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदकासह भारताची पदकसंख्या सातपर्यंत नेली. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम भारताने यंदा मोडीत काढला. त्यामुळे नीरज चोप्रा आणि बजरंग पुनिया दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान बजरंग पुनियाने एक्सप्रेस अड्ड्यावर मनसोक्त गप्पा मारल्या.

बजरंग पुनिया म्हणाला, “पहिल्यांदाचं भारतात क्रिकेटपेक्षा ऑलिम्पिकला जास्त महत्व. हे यावर्षी पाहायला मिळालं. आम्ही जी तयारी केली ती ५ ते ६ महिन्यात केली. करोनामुळे जास्त वेळ मिळाला नाही. पण जो वेळ मिळाला त्यात आम्ही कसून सराव केला. त्याचं फळ आम्हाला मिळालं. मेहनत करणाऱ्या व्यक्तीला आतून आवाज येतो, तू काहीही करु शकतोस. देशासाठी मेडल आणू शकतो.”

मी आतापर्यंत सिनेमागृहात गेलो नाही

बजरंग म्हणाला, “मी आतापर्यंत सिनेमागृहात गेलो नाही. कारण माझं ध्येय पक्क होतं. आधी ऑलिम्पिकमध्ये मेडल नंतर सिनेमा असं ठरवलं होतं. मी तीन तास एका जाग्यावर बसू शकत नाही. आताही मी सिनेमागृहात गेलो नाही. आता २०२४ नंतरच जाईल. मी फोन सुद्धा वापरत नव्हतो. योगेश्वर सोबत असतांना त्याच्या फोनवरुन घरी बोलत होतो. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है”

सिनेमातील कुस्तीबात बजरंग म्हणाला…

सिनेमातील कुस्तीबात बजरंगला प्रश्न विचारण्यात आला. बजरंग म्हणाला, “मला वाटते ते फेक असते. पण आम्ही खेळतो ती कुस्ती नैसर्गिक आहे. सिनेमा सारखी कुस्ती नसते. रीअल लाईफमध्ये मेहनत पाहिजे. सलमान खान सुलतान चित्रपटात कधी कुस्ती खेळायचा तर कधी काही. ते रीअल लाईफ मध्ये शक्य नाही. ५ ते ६ महिने लग्नाला झाले. मी लग्न झाल्यापासून घराच्या दूर आहे. मात्र पत्नी सुद्धा रेसलर असल्यामुळे ती समजून घेते. माझा सराव, डाएट, या सर्वांची ती काळजी घेते”

जखमी असतांना कसा खेळलास?

जखमी असतांना कसा खेळलास यावर बजरंग म्हणाला, “मी अनेक खेळाडू बघितले. ते जखमी असतांना खेळतात. पण माझे स्वन्प होतं मेडल आणायचं. त्यामुळे जखमेचा विचार केला नाही. फक्त माझ्या खेळावर लक्ष दिले. मॅटवर जातो तेव्हा फक्त खेळ दिसतो. अशावेळी आजूबाजूचे लोक देखील महत्वाचे असतात. ते कशे मार्गदर्शन करतात ते महत्वाचं असते. त्यामुळे मी जखमीचा विचार केला नाही.”