भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि विंडीज संघाच्या मालिकेतील सर्व ६ सामने फक्त अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील. बीसीसीआयने शनिवारी २२ जानेवारी रोजी एक निवेदन जारी केले. देशाची जैव-सुरक्षा बबल मजबूत ठेवण्यासाठी, मालिकेच्या सामन्यांची ठिकाणे ६ वरून फक्त २ करण्यात आली आहेत. सध्या देशात करोना विषाणू संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि जवळपास दररोज तीन लाखांहून अधिक संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत, ज्यात ओमिक्रॉन संक्रमित लोकांचा समावेश आहे, असे बीसीसीआयने म्हटले. वेस्ट इंडिजचा संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे, त्यानंतर संघ जानेवारीच्या अखेरीस भारतात पोहोचेल. या दौऱ्याची सुरुवात ६ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे मालिकेने होणार आहे. यानंतर १६ फेब्रुवारीपासून कोलकाता येथील इडन गार्डन्स स्टेडियमवर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हेही वाचा - VIDEO: विचित्र पद्धतीनं रनआऊट झाला आंद्रे रसेल; “असं कधीच पाहिलं नाही,” वसीम जाफरलाही बसेना विश्वास १२ फेब्रुवारीला खेळला जाणारा एकदिवसीय सामना आता ११ फेब्रुवारीला होणार आहे. आयपीएल २०२२साठी खेळाडूंचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, एकदिवसीय मालिकेतील सामने अहमदाबादमध्ये ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला खेळवले जातील. यानंतर, दोन्ही संघ कोलकात्याला रवाना होतील, जिथे १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी टी-२० मालिकेतील तीनही सामने खेळवले जातील.