भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या कर्णधारपदावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रोहित शर्माला एक महान कर्णधार असे वर्णन केले असून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवताना तो भरपूर यश मिळवेल असे म्हटले आहे.

रोहित शर्माला नुकतेच भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय त्याला कसोटी संघाचा उपकर्णधारही करण्यात आले आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि त्याला भारतीय संघातही अशीच कामगिरी करायला आवडेल.

न्यूज १८ या वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात गांगुलीने आयपीएलचे उदाहरण दिले आणि रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार असल्याचे वर्णन केले. तो म्हणाला, ”रोहित शर्मा एक महान कर्णधार आहे आणि तेव्हाच निवड समितीने त्याला पाठिंबा दिला आहे. तो संघाला नक्कीच नव्या उंचीवर नेईल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने पाच विजेतेपदे पटकावली आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने आशिया चषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत विजय मिळवून दिला होता, विराट कोहली त्या संघात नव्हता. विराटशिवाय संघ जिंकला आणि यावरून संघ किती मजबूत आहे, हे दिसून येते. रोहित शर्माने मोठ्या स्पर्धांमध्ये यशाची चव चाखली आहे. त्यांच्याकडे चांगला संघ आहे आणि आशा आहे की भारतीय संघ भरपूर यश मिळवेल.”

हेही वाचा – VIDEO : ‘‘महाराष्ट्राची मिसळ पाव एक नंबर…”, ‘खादाड’ सचिनला पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी!

१२ डिसेंबरला म्हणजेच आज संध्याकाळी भारतीय क्रिकेट संघ मुंबईत जमणार आहे, तेथून पुढील ३ दिवस ते हॉटेलमध्ये क्वारंटाइन असतील. यानंतर १६ डिसेंबरला सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकला आलेली नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून तर शेवटची कसोटी ११ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.