आपल्या जादुई फिरकीने भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराकरिता शिफारस केली आहे. बीसीसीआयने २०१२-१३ वर्षांसाठी अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवले होते.
‘‘३० एप्रिल ही अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याची शेवटची तारीख होती. अश्विनच्या नावाची आम्ही शिफारस केली आहे. अन्य कोणत्याही क्रिकेटपटूची शिफारस केलेली नाही,’’ असे बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट विकास) रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.