भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात २-० ने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईत बीसीसीआय कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडणार आहे.

सलामीच्या जोडीत लोकेश राहुलचं अपयश हे सध्या भारतीय संघाच्या चिंतेचं महत्वाचं कारण ठरत आहे. त्यामुळे वन-डे संघाचा सलामीवीर रोहित शर्माला आफ्रिकेविरुद्ध मालिकेत सलामीला येण्याची संधी मिळू शकते. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माचा सलामीच्या जागेसाठी विचार केला जाऊ शकतो असे संकेत दिले होते.

१५ सप्टेंबरपासून भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत लोकेश राहुल कसोटी संघातलं आपलं स्थान कायम राखतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.