भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात रंगलेल्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने स्पर्धेवर आपलं वर्चस्व राखलं. IPL 2020 च्या आयोजनातून बीसीसीआयही मालामाल झालंय. तेराव्या हंगामातून बीसीसीआयने तब्बल ४ हजार कोट कमावले आहेत. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी इंडियन्स एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली. कमाईच्या बाबतीतच बीसीसीआय मालामाल झालं नसून गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलचे सामने टिव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येतही २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धुमाळ यांनी बीसीसीआयने कमावलेल्या ४ हजार कोटींचं वर्गीकरण करुन सांगायला नकार दिला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात दुबई, अबु धाबी आणि शारजा या तीन मैदानांवर हे सामने रंगले. “तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचं आयोजन करुन नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडं संभ्रमाचं वातावरण होतं. खेळाडूंना काही झालं तर काय करायचं ही भीती मनात होती. परंतू जय शहा हे ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता.”

गेल्या आयपीएल हंगामाच्या तुलनेत बोर्डाने आपले खर्च ३५ टक्क्यांनी कमी केले. या काळातही आम्ही ४ हजार कोटींची कमाई केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपुर्व होता. जे सुरुवातीला आमच्यावर शंका घेत होते, त्यांनी नंतर येऊन आमचे आभार मानले. यंदाची स्पर्धा झाली नसती तर क्रिकेटपटूंनी एक वर्ष गमावलं असतं, धुमाळ यांनी माहिती दिली.

युएई आणि श्रीलंका अशा दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू याआधी युएईने आयपीएलच्या काही सामन्यांचं आयोजन केलं होतं…ज्यामुळे बीसीसीआयने युएईला पसंती दिली. खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते Bio Secure Bubble तयार करण्यापर्यंत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने फोन, व्हर्च्युअल मिटींग करत या सर्व गोष्टी जुळवून आणल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व बाबतीत मदत केलेल्या युएई क्रिकेट बोर्डाचेही धुमाळ यांनी आभार मानले.