यंदाच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी खराब झाली. सुपर-१२ च्या पाचपैकी फक्त तीन सामने भारताला जिंकता आले. यानंतर गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बायो बबलवर प्रश्न उपस्थित केले. या स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय खेळाडू सहा महिन्यांहून अधिक काळ बायो बबलमध्ये होते.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आता इंग्लिश प्रीमियर लीगचा (ईपीएल) फॉर्म्युला स्वीकारू शकते. म्हणजेच खेळाडूंना यापुढे बायो बबलमध्ये राहावे लागणार आहे. आता त्यांची नेहमी करोना चाचणी केली जाईल. ईपीएलच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही आयसोलेशनमध्ये पाठवले जात नाही. जे पॉझिटिव्ह येतात त्यांनाच क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. शुक्रवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत बायो-बबलच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. चर्चेदरम्यान, सदस्यांनी मान्य केले की बायो-बबल मॉडेल टिकाऊ नाही.

बबल लाईफचा खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषत: अशा संघांवर ज्यांना फॉरमॅटमध्ये खेळण्याचा ताण आहे. उदाहरणार्थ, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ दोन जून रोजी इंग्लंडला रवाना झाला. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीपर्यंत खेळाडू बायो-बबलमध्ये राहिले. यानंतर बहुतेक खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बायो-बबलमध्ये गेले. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेलाही प्रारंभ झाला.

हेही वाचा – T20 WC FINAL: जिंकलंस भावा..! मोडलेला हात बाजूला ठेवून मदतीचा ‘हात’ केला पुढं; न्यूझीलंडच्या खेळाडूचा VIDEO व्हायरल!

टीम इंडियाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकातील त्यांच्या संघाच्या शेवटच्या सामन्यानंतर अशा दीर्घ बबल लाइफचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, ”जेव्हा तुम्ही सहा महिने बायो बबलमध्ये असता, तेव्हा ते जगणे कठीण असते. असे अनेक खेळाडू आहेत जे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात. गेल्या २४ महिन्यांत ते फक्त २५ दिवस घरी होते. तुम्ही कोण आहात याची मला पर्वा नाही, जर तुमचे नाव ब्रॅडमन असेल, जरी तुम्ही बबलमध्ये असलात तरीही तुमची सरासरी खाली येईल, कारण तुम्ही माणूस आहात, लवकरच बबल फुटेल. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल आणि याचा आयसीसीनेही विचार करावा.”

मात्र, हा नवा नियम लागू करण्यासाठी आयसीसीने अद्याप कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. टीम इंडियाला १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. या मालिकेत तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने आहेत.