टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि क्रिकेट कारकीर्दीत तग धरण्यासाठी तो क्रिकेटचा एक फॉरमॅट सोडू शकतो. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.

इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की हार्दिक पंड्या दुखापतीशी झुंज देत आहे आणि तो कसोटीतून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे, मात्र त्याने अद्याप याबाबत बोर्डाला अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. हार्दिक पंड्या अद्याप टीम इंडियाच्या कसोटी योजनेचा भाग नाही. मात्र, त्याची निवृत्ती टीम इंडियासाठी मोठा झटका असेल आणि संघाला त्याचा बॅकअप लवकरात लवकर शोधावा लागेल.

हेही वाचा – लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल कोणाचे शेजारी होणार माहितीये का? नाव वाचून बसेल धक्का!

बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली आहे, की हार्दिक वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कसोटीला अलविदा करू शकतो. हार्दिकला २०१९ मध्ये पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून हार्दिकला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता आलेली नाही, त्यामुळे त्याचा फटका त्याला सहन करावा लागत आहे.

दुखापतीमुळे हार्दिकला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तो पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करू शकत नाही आणि आयपीएल २०२१ आणि टी-२० विश्वचषकातील त्याची कामगिरी खराब झाली आहे. गेल्या एका वर्षात हार्दिकला वनडे आणि टी-२० मध्ये एकूण ४६ षटके टाकता आली आहेत, ती देखील त्याची गोलंदाजी तितकी मजबूत नाही. त्यामुळेच हार्दिक संघाबाहेर आहे.

हार्दिक सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत असून वृत्तानुसार तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. हार्दिकसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे कारण पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-२० आणि वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. हार्दिक फिट नसेल, तर त्याचे आणि टीम इंडियाचे मोठे नुकसान होऊ शकते.