नवी दिल्ली :बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आलेला उंच उडीपटू तेजस्विन शंकरच्या कामगिरीचा गुणवत्तेनुसार विचार करावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय अॅथलेटिक्स निवड समितीला दिले आहेत. वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग न घेणे, हा संघनिवडीसाठी एकमेव निकष ठरू शकत नाही. पदकाची खात्री असलेल्या खेळाडूंबाबत अहंकार आड येऊ देता कामा नये, असे मत न्यायालयाने मांडले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि निवड समिती यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय महाविद्यालयीन अॅथलेटिक्स संघटनेच्या अजिंक्यपद स्पर्धेत तेजस्विनने पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्याला स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघात स्थान द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.