IPL 2019: शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. हातातून सामना निसटणार अशी परिस्थिती असतानाही मुंबईने पुनरागमन करत चेन्नईचा पराभव केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा रन आऊट सामन्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. सामना संपल्यानंतर धोनीला पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल मालिकेत खेळणार का ? असं विचारलं असता त्याने त्याबद्दल आत्ताच बोलायला नको असं सांगितलं. सध्या आम्ही सगळे विश्वचषकार लक्ष केंद्रीत करत आहोत असंही धोनीने सांगितलं आहे.

सामना संपल्यानंतर क्लोझिंग सेरेमनीदरम्यान धोनीला पुढील वर्षी आयपीएल मालिकेत खेळताना दिसणार का? असं विचारलं असता त्याने सांगितलं की, ‘त्याबाबत आत्ता भविष्यवाणी करणं योग्य ठरणार नाही. सध्या सर्व लक्ष विश्वचषकावर केंद्रीत करत आहोत. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जसंबंधी बोलू, पण पुढच्या वर्षी भेटू अशी आशा आहे’.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.