पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे वाया गेला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं चांगली कामगिरी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. या आक्रमकतेमुळे भारताला विजयात मोलाची साथ मिळाली. मात्र आक्रमक बाणा दाखवत असताना विराट कोहलीने सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला माजी क्रिकेटपटू फारोख इंजिनिअर यांनी दिला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्या तिसऱ्या कसोटी सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. "मी विराट कोहलीच्या आक्रमकतेचं कौतुक करतो. तो एक चांगला कर्णधार आहे. पण मर्यादेत राहणं आवश्यक आहे. अन्यथा पंच आणि सामनाधिकारी हस्तक्षेप करू शकतात. त्याने आपली आक्रमकता थोडी कमी करावी. कारण तो त्यात वाहत जातो. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याचं फलंदाजीवरून लक्ष विचलीत व्हावं म्हणून ते स्लेजिंग करतात. त्यामुळे विराटचं नुकसान होतं. बुमराह आणि शमी खडूस आहेत. ते त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात. ते चांगली फलंदाजी करत नाहीत, पण त्यांना तग धरायचं माहिती आहे. त्यांनी केलेल्या धावांमुळे विराटला डाव घोषित करणं सोपं गेलं. हे इंग्लंडसाठी धक्कादायक होतं.", असं माजी क्रिकेटपटू फारोख इंजिनिअर यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितलं. ‘छोटा मेस्सी’ म्हणून जगभर पोहोचलेल्या ‘त्या’ अफगाणी मुलाचं पुढं झालं काय? लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनेकांना वर्षानुवर्षे लक्षात राहील. भारताने १५१ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या संघर्षामुळे हा सामना संस्मरणीय ठरला. या सामन्यादरम्यान जेम्स अँडरसन-विराट कोहली, अँडरसन-जसप्रीत बुमराह, जोस बटलर-बुमराह यांच्यात बरीच बाचाबाची झाली. बुमराह दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याचा जोस बटलरशी वाद झाला. त्यानंतर त्याने मोहम्मद शमीसोबत नाबाद ८९ धावांची भागीदारी केली आणि ती भागीदारी सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरली. भारताने इंग्लंडला ६० षटकांत २७२ धावांचे लक्ष्य दिले आणि इंग्लंडचा डाव ५२ षटकांपूर्वी १२० धावांवरच आटोपला.