मुंबई : क्रिकेटपटूंना आता कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तीन विविध प्रकारांत खेळावे लागत असल्याने तंदुरुस्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. एजिस फेडरल इन्शुरन्स चषक (१३ वर्षांखालील) स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी ते उपस्थित होते. ‘‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी तुम्ही तंदुरुस्तीचा दर्जा अधिक वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे,’’ असा सल्ला वेंगसरकरांनी युवा क्रिकेटपटूंना दिला. ‘‘क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील सर्वात महत्वाचा घटक असून प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकांनी यावर अधिक भर देण्याची गरज आहे. एखादा महत्त्वाचा झेल, वाचवलेली धाव अथवा अचूक फेक करून फलंदाजाला धावचीत केल्यास सामन्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो,’’ असे वेंगसरकर पुढे म्हणाले. प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीला जेतेपद प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी संघाने अंतिम सामन्यात टायटन्स क्रिकेट अकादमीवर ७६ धावांनी विजय मिळवत एजिस फेडरल इन्शुरन्स चषक (१३ वर्षांखालील) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जय नाडर (५६) आणि आर्यन पवार (४०) यांच्या योगदानामुळे प्रो वर्ल्ड टॅलेंटने २० षटकांत ७ बाद १८७ अशी धावसंख्या उभारली. मग त्यांनी टायटन्सला ७ बाद १११ धावांवर रोखले.