IND vs AUS 3rd Test Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा ९ विकेट्सने पराभव झाला. या सामन्यातील निराशाजनक कामगिरीबद्दल माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी शुक्रवारी भारतीय फलंदाजांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “खेळपट्टीने त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले”. पहिल्याच चेंडूपासून फिरकीला साथ देणाऱ्याखेळपट्टीवर भारतीय संघाला दोन्ही डावात केवळ १०९ आणि १६३ धावा करता आल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशीच विजयी होऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
फलंदाजांनी खरोखरच त्यांच्या प्रतिभेला न्याय दिला नाही –
गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “फलंदाजांनी खरोखरच त्यांच्या प्रतिभेला न्याय दिला नाही. जर तुम्ही भारतीय फलंदाजांच्या विकेट्सच्या पडझडीवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय फलंदाजांनी त्यांच्याच चुकांमुळे विकेट गमावल्या आहेत. ते असे काही फटके खेळत होते, की खेळपट्टीवरून चेंडू कसा येईल याचा अंदाज त्यांना आधीच आला होता.”
भारतीय फलंदाजीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून आली –
गावसकर पुढे म्हणाले, “ जर तुम्ही पाहिल्यास, भारतीय फलंदाजीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून आली. कारण रोहित शर्माशिवाय त्यांनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत. रोहितने नागपुरात शानदार शतक झळकावले होते. जेव्हा तुमच्या खात्यात कमी धावा असतात, तेव्हा फलंदाजीत काहीशी अस्थिरता येते.”
खेळपट्टीला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले –
माजी दिग्गज म्हणाला, “ते खेळपट्टीवर चेंडूच्या जवळ जाऊ शकत नव्हते. त्यांनी खेळपट्टीला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले. पहिल्या डावातच खऱ्या अर्थाने त्याच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली खेळपट्टी होती. हा प्रभाव दुसऱ्या डावात अधिक दिसून आला.” भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे जोरदार खूप केल. भारतीय संघ आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही, असे त्याचे मत आहे.
सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्ही आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळत असता, तेव्हा तुम्ही एका ठिकाणी गोलंदाजी करून दबाव निर्माण करू शकता. आम्ही त्यांच्या गोलंदाजांना एका ठिकाणी गोलंदाजी करू दिली. त्याचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांना, विशेषत: नॅथन लायनला दिले पाहिजे. आम्हाला उत्कटता दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता, पण मला वाटते की आम्ही ते करू शकलो नाही.”