या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा भारताने पाकिस्तानवर मात केली. Super 4 च्या फेरीत भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने यांनी झळकावलेली शतके हे आजच्या भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले. पण त्याहीपेक्षा चर्चा झाली ते पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सामना सुरु असतानाच पळ काढल्याची…

सामन्याचा दुसरा डाव सुरु होता. भारताला विजयासाठी २३८ धावांची आवश्यकता होती. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धमाकेदार सलामी देत फटकेबाजी सुरु केली. या फटकेबाजीमुळे भारताचा विजय हा जवळपास निश्चितच वाटू लागला होता. पहिल्या सामन्यातही भारताने पाकिस्तानला धूळ चारताना तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे या सामन्यातही पाकिस्तानची हीच गट होणार हे चाहत्यांना स्पष्ट दिसून लागले आणि म्हणून पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून पळ काढला, अशी चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली.

शोएब मलिकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये २३७ धावा करता आल्या. भारताने धारदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मलिकने ९० चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७८ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित-धवन जोडीने १० षटकांत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे भारताची ही दमदार सलामी पाहूनच मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला, अशा पद्धतीने त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली.