केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी बेंगळूरुतील भारतीय क्रीडा प्राधिकरणात असलेल्या पुरुष आणि महिला हॉकी संघातील अनुभवी खेळाडूंशी संवाद साधला. टाळेबंदी उठल्यानंतर नियंत्रित वातावरणात सरावाची परवानगी देण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. ४० पेक्षा जास्त हॉकीपटू, प्रशिक्षक आणि उच्च कामगिरी संचालकांनी सराव सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रिजिजू यांच्याकडे केली होती. ‘‘छोटय़ा तुकडय़ांमध्ये आम्ही प्राथमिक कौशल्य तसेच पेनल्टी कॉर्नरचे तंत्र सुधारण्यावर मेहनत घेऊ. त्यामुळे आम्हाला ऑलिम्पिकची तयारी करता येईल,’’ असे पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने सांगितले. भारतीय हॉकीपटू गेल्या दोन महिन्यांपासून आपापल्या खोल्यांमध्ये बंदिस्त असून त्यांच्यात मानसिक नैराश्येची भावना वाढू लागली आहे.