टोक्यो : अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करीत कामगिरी केली आहे. भारताची मंगळवारी विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे.

आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत आहे. रविवारी भारताने ब्रिटनला ३-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठली आणि आता भारत पदकापासून एका विजयाच्या अंतरावर आहे, याची प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना खात्री आहे.

१९८०च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक ब्रिटनला ३-१ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते. पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. १९७२मधील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताने ०-२ अशी हार पत्करली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांत विजय मिळवला आहे.