राहुल द्रविडला आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जाते. भारतीय संघातील ‘द वॉल’ अशी ख्याती असलेला द्रविड कसोटी फलंदाजीचा ‘परफेक्शनिस्ट’ मानला जातो. द्रविडने विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या आक्रमक धोरणापुढे संघात समतोल ठेवण्याचे काम केले. आपण सेहवाग किंवा सचिनसारखा आक्रमक खेळ करू शकणार नाही. आपला शांत आणि संयमी स्वभाव आपली ताकद ठरू शकते, याची द्रविडला सुरुवातीलाच जाणीव झाली होती. अभिनव बिंद्राच्या कार्यक्रमामध्ये याबाबत राहुलने खुलासा केला.

भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या ‘इन द झोन’ पॉडकास्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड पाहुणा म्हणून आला होता. यावेळी द्रविडने अनेक गोष्टींचा खुलासा केला. बिंद्राने द्रविडला त्याच्या स्वभावाबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्याबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, “मी माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली तर माझ्यातील ऊर्जा ही ‘गेम चेंजर’ ठरली. मी मानसिक ऊर्जा पेलवून ठेवण्यास सक्षम होतो. मी माझ्या खेळाचा विचार करण्यात आणि चिंतन करण्यात मी बरीच ऊर्जा खर्च करायचो. कालांतराने मला कळले की त्यातून माझ्या फलंदाजीला काहीही मदत होत नाही. याच उर्जेचा योग्य वापर करून मी संयमी खेळ करण्यावर भर दिला. या गोष्टीचा मला फायदा झाला.”

हेही वाचा – मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बदलाचे वारे; सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांसह अनेक दिग्गज गमावणार मतदानाचा हक्क!

“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारखे मी कधीही आक्रमकपणे खेळू शकलो नाही. याची मला सुरुवातीलाच जाणीव झाली होती. परंतु, माझ्या मानसिक उर्जेचा वापर दबावाशी लढण्यात अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आले. यातूनच आमच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांशी लढण्याचा स्वतःचा मार्ग मी शोधला होता,” असे द्रविडने सांगितले.