टीम इंडिया २३ ऑक्टोबर पासून आपल्या टी२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करत आहे. या अगोदर बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष, रॉजर बिन्नी यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला की, खेळाडूंना वारंवार दुखापती होण्याच्या समस्येचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले की, विश्वचषकाच्या १० दिवस आधी जसप्रीत बुमराहला झालेल्या दुखापतीकडे, आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तीन दिवस आधी बुमराह दुखापतीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. नेमके त्याचवेळी मोहम्मद शमीला कोविड-१९ ची लागण झाली होती. त्यामुळे बुमराहच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यासाठी बीसीसीआयला शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली.

बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही बिन्नी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सत्कार समारंभात बिन्नी म्हणाले, ”खेळाडूंना इतक्या वाईट रीतीने दुखापत का होत आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे. आताच नाही तर गेली चार-पाच वर्षे हे सत्र सुरु आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे चांगला प्रशिक्षक किंवा ट्रेनर नाही असे नाही. खेळाडूंवर खूप ओझे आहे की ते खूप फॉरमॅट खेळत आहेत. यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. याला माझे प्रथम प्राधान्य आहे.”

हेही वाचा : T20 World Cup 2022: भारत पाकिस्तान सामन्यावर निसर्गाचं संकट; रद्द झाल्यास लाखो कोटींचा फटका

बिन्नी म्हणाले, ‘‘वर्ल्ड कपच्या १० दिवस आधी बुमराहच्या दुखापतीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यानंतर त्याची जागा कोण घेईल. अशा गोष्टींना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे.” बीसीसीआयच्या अध्यक्षांनी रणजी ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांसाठी चांगल्या खेळपट्टया तयार करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

रॉजर बिन्नी म्हणाले, सध्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल नाहीत. आम्हाला पायाभूत सुविधांवरही काम करावे लागेल.” भारतीय क्रिकेटपटूंच्या धर्तीवर देशांतर्गत क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देण्याबाबत बिन्नी म्हणाले, “देशांतर्गत क्रिकेटपटूंची काळजी घेतली जात आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. मला वाटत नाही की त्याची (केंद्रीय कराराची) सध्या गरज आहे.