टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (३० ऑक्टोबर) रोजी ग्रुप बी मधील सामना झाला. टी२० विश्वचषक २०२२ मधील हा भारताचा तिसरा सामना होता. टी२० विश्वचषक २०२२ मधील हा ३० वा सामना असून पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिकेने तो सामना पाच गडी राखून जिंकला. या विजयाने आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल अजून जवळ गेला आहे. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताला विजयापासून लांब नेले. सुर्यकुमार यादवची ६८ धावांची खेळी व्यर्थ गेली. लुंगी एनगिडीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टीम इंडियाने पहिल्या दहा षटकात शानदार गोलंदाजी केली. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी झटपट बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला अडचणीत आणले. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी शानदार अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेला विजयाचा उंबरठ्यावर नेले.खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले. यादरम्यान दोघांना टीम इंडियाने गचाळ क्षेत्ररक्षण करत दोन जीवदान देखील दिले. चौथ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केल्यानंतर मार्कराम ५२ धावा करत बाद झाला.

मार्कराम बाद झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या मिलरने १८व्या षटकात अश्विनला दोन षटकार लगावत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नेला. अखेरच्या दोन षटकात १२ धावांची गरज असताना शमीने केवळ सहा धावा देत सामना रंगतदार बनवला. २० व्या षटकात मिलरने दोन चौकार मारत सामना जिंकून दिला. डेव्हिड मिलर ४६ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला.

तत्पूर्वी, भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट्सची पडत गेल्या. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला तंबूत पाठवले.

भारताच्या ४९ धावांवर पाच गडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. कार्तिक १६व्या षटकात वेन पारनेलकरवी झेलबाद झाला. त्याचा झेल रिले रुसोने घेतला. कार्तिकला १५ चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या.