भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला १० विकेट्सने धूळ चारली. या पराभवाने संपूर्ण देश हादरला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंसह चाहते टीम इंडियावर जोरदार टीका करत आहेत. खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघातून वगळण्याची मागणीही चाहते करत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या दोन माजी खेळाडूंनी चाहत्यांना वाईट काळात संघाला साथ देण्याचे आवाहन केले आहे. २०११ चा विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला सचिन तेंडुलकर आणि त्या टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेला युवराज सिंग हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर सचिनने ट्विट करून म्हटले, ''एका नाण्याला दोन बाजू असतात. जीवनाचेही तसेच आहे. संघाचा विजय हा आपला विजय म्हणून साजरा केला, तर संघाच्या पराभवातही असेच केले पाहिजे. आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे. या दोन गोष्टी आयुष्यात बरोबरीने चालत असतात.'' https://twitter.com/sachin_rt/status/1590732938626621440?s=20&t=ZQ93RftwmFfet07KttiUEA त्याचबरोबर युवराज सिंग ट्विटमध्ये म्हणाला, ''जेव्हाही आपला संघ मैदानात उतरतो, तेव्हा आपल्याला आपला संघ जिंकताना पहायचा असतो. मात्र, हे मान्य करावे लागेल की, असे काही दिवस येतील की, जेव्हा आपल्यानुसार निकाल मिळणार नाहीत. संपूर्ण स्पर्धेत संघ ज्या प्रकारे एकजुटीने खेळला त्याचा मला अभिमान आहे. आता आम्ही आमची कामगिरी आणखी कशी सुधारू शकतो आणि जोरदार पुनरागमन करू शकतो हे पाहण्याची वेळ आली आहे.'' https://twitter.com/YUVSTRONG12/status/1590757951190728704?s=20&t=R3D_q_S_G_S2z6Hf9Jd6yA उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंडने भारतावर १० विकेट्स राखून मात केली. त्यांनी १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी विराट कोहलीने ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात बिनबाद १७० धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.