वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवल्याचा भारतीय संघाचा चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत भारताने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. याचसोबत दुसऱ्या कसोटीत 10 बळी घेणारा उमेश यादव, फलंदाजीत चमक दाखवलेले नवोदीत पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनाही कसोटी क्रमवारीत फायदा झालेला आहे.

उमेश यादव कसोटी क्रमवारीत 25 व्या स्थानावर पोहचला आहे. एका कसोटीत 10 बळी घेण्याच्या कामगिरीचं फळ त्याला मिळालेलं असल्याचं दिसतं आहे. एका कसोटीत 10 बळी घेणारा उमेश तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी जवागल श्रीनाथ आणि कपिल देव यांनी अशी कामगिरी केली आहे. याचसोबत राजकोट कसोटीत शतक आणि हैदराबाद कसोटीत अर्धशतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉची क्रमवारीत 73 व्या स्थानावरुन 60 व्या स्थानावर बढती झाली आहे. ऋषभ पंतला दोन्ही कसोटीत शतकाने हुलकावणी दिली होती, त्याच्या या कामगिरीने पंतला क्रमवारीत 62 वं स्थान मिळालं आहे.

आयसीसीची कसोटी क्रमवारी पुढीलप्रमाणे –

1) भारत – 116 गुण
2) दक्षिण आफ्रिका – 106 गुण
3) ऑस्ट्रेलिया – 106 गुण
4) इंग्लंड – 105 गुण
5) न्यूझीलंड – 102 गुण
6) श्रीलंका – 97 गुण
7) पाकिस्तान – 88 गुण
8) वेस्ट इंडिज – 76 गुण
9) बांगलादेश – 67 गुण
10) झिम्बाब्वे – 2 गुण