India vs Australia 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशा फरकाने विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय संघाने पाच गडी गमावून ३९९ धावा केल्या होत्या. मात्र, पावसाचा अडथळा आल्यामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकांत २१७ धावांवर आटोपला
इंदूरमध्ये भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. मोहालीनंतर आता दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. २००६ मध्ये येथे प्रथमच एकदिवसीय सामना खेळला होता. येथील सात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्याचवेळी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा विजय मिळवला. २०१७ मध्ये टीम इंडियाने कांगारूंचा पाच विकेट्सने पराभव केला होता.
शॉन ॲबॉटची वादळी खेळी ठरली व्यर्थ –
ऑस्ट्रेलियाकडून शॉन ॲबॉटने ५४ आणि डेव्हिड वॉर्नरने ५३ धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने २७ आणि जोश हेझलवूडने २३ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने १९ आणि ॲलेक्स कॅरीने १४ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट नऊ धावा, जोश इंग्लिश सहा धावा आणि अॅडम झम्पा पाच धावा करून बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ खातेही उघडू शकला नाही. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला दोन आणि मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.
शतकवीर श्रेयस अय्यर ठरला सामनावीर –
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले. तो शतकानंतर १०५ धावा काढून बाद झाला. त्याने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी –
मार्चमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर होता. यानंतर त्याने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन केले, मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. श्रेयसने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी केली. शुबमन गिलनेही एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे आणि एकूण नववे शतक ९२ चेंडूत झळकावले. त्याने ९७ चेंडूत १०४ धावांचे योगदान दिले.
अखेरच्या टप्प्यात सूर्यकुमार आणि राहुलची वादळी खेळी –
केएल राहुलने ३८चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर रवींद्र जडेजा १३ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये २४चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन ॲबॉट आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: शुबमन-श्रेयसच्या भागीदारीने मोडला सचिन आणि लक्ष्मण जोडीचा २२ वर्ष जुना विक्रम
मालिकेतील विजयासोबतच भारताने यंदाच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. कांगारू संघाने मार्चमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा २-१असा पराभव केला होता. दोन्ही संघांमधील सध्याच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (२७सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: शुबमन गिलने हाशिम आमलाचा विक्रम मोडत रचला इतिहास, झळकावले वनडेतील सहावे शतक
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि विश्वचषकासाठी निवडलेले सर्व खेळाडू या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विश्वचषक संघाशिवाय रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील उपस्थित राहणार आहेत. विश्वचषकापूर्वी दोघांची आणखी एक चाचणी होणार आहे. दुखापतग्रस्त अक्षर पटेल बरा झाला नाही तर अश्विन किंवा सुंदरची विश्वचषकासाठी निवड होऊ शकते.