बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने बुधवारी (१४ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात केली. रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. टीम इंडियाने बुधवारी सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मोठ्या काळानंतर देशासाठी खेळला असून त्याने शानदार फलंदाजी केली मात्र तो शतकापासून वंचित राहिला. तर बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेत बाहेर असलेला ऋषभ पंत याने पहिल्याच कसोटीत संघात पुनरागमन केले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या सहा गडी गमावून २७८ अशी झाली आहे. श्रेयस अय्यर सध्या ८२ धावांवर खेळत आहे, तर रविचंद्रन अश्विन अद्याप फलंदाजीला आलेला नाही. यानंतर तळाचे फलंदाज सुरू होतील. अश्विन दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरसह फलंदाजीसाठी उतरेल आणि भारतीय संघ ३५० धावांच्या जवळपास धावा करण्याचा प्रयत्न करेल. https://twitter.com/BCCI/status/1602978619734622209?s=20&t=iqZtPoN5S2-n9o1AjrFdGA पहिल्या दिवशी काय झाले? भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलसह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र, गिल २० धावा करून बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या ४१ धावा होती. गिल तंबूत परतताच कर्णधार राहुल आणि विराट कोहलीही बाद झाले. ४८ धावांवर तीन विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. यानंतर पंत आणि पुजाराने भारतीय डाव सांभाळला, दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. यानंतर पंतही ४६ धावा करून बाद झाला. हेही वाचा: ICC Rankings: काल आलेलं पोरगं विराट कोहलीला देतयं टशन, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनने केली विक्रमाशी बरोबरी श्रेयस अय्यरला हाताशी घेत पुजाराने डाव पुढे नेला. दोघांनीही शानदार फलंदाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, दिवसअखेर पुजारा शतक गाठण्यापूर्वीच बाद झाला. त्याने ९५ धावांची खेळी खेळली. यानंतर अक्षरने श्रेयससोबत १९ धावा जोडल्या, पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर तोही बाद झाला. आता श्रेयस अय्यर खेळपट्टीवर अजूनही टिकून आहे. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना अजून फलंदाजी करायची आहे. त्यांना हाताशी धरत भारताला मोठे लक्ष फलकावर लावण्याचे आव्हान त्याच्या खांद्यावर असणार आहे. हेही वाचा: Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या वाटेवर, रणजी पदार्पणातच झळकावले शतक, १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती बांगलादेशकडून तैजुल इस्लामने पहिल्या दिवशी तीन बळी घेतले. त्याचवेळी मेहदी हसन मिराजने दोन गडी बाद केले. खालेद अहमदला ब्रेकथ्रू मिळाला. इबादत हसननेही श्रेयस अय्यरला बाद केले, पण जामीन पडले नाही आणि श्रेयस अजूनही खेळत आहे. श्रेयस अय्यरने रचला इतिहास या सामन्यात श्रेयस अय्यर याने ९३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी सामन्यात सुरुवातीच्या १० डावांमध्ये त्याने ५ वेळा अर्धशतकी टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या १० डावांमध्ये प्रत्येेक डावात दोन अंकी धावसंख्या करणारा श्रेयस अय्यर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या १० डावांमध्ये तो एकदाही एकेरी धावसंख्येवर बाद झाला नाही. भारताच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा श्रेयस अय्यर पहिला खेळाडू आहे. १०५,६५,१८,१४, २७,९२,६७,१५,१९,८२*(या सामन्यात) श्रेयस अय्यर याने न्यूझीलंड विरुद्ध २५ नोव्हेंबर २०२१ला कानपूरमध्ये आपले पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने १०५ आणि ६५ धावांंची खेळी केली होती. त्याने आतापर्यंत ६ सामन्यांच्या १० डावात ५१ पेक्षा जास्तच्या सरासरीने ४७२ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या रुपात एक विश्वासार्ह फलंदाज मिळाला आहे. त्याने आतापर्यंत फक्त ५ आणि ६ क्रमांकावर फलंदाजी केली आहे.