सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बांगलादेशने ५ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली. या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. मात्र तरी तो फलंदाजीसाठी आला त्याने झुंजार अर्धशतक करत २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. मात्र त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशने ठेवलेल्या २७१ धावांचा पाठलाग रोहितच्या अनुपस्थितित विराट कोहलीला सलामीसाठी यावे लागले. मात्र, तो काही खास करु शकला नाही आणि अवघ्या ५ धावा करून बाद झाला. क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या हाताला चेंडू लागल्यामुळे मैदानातून बाहेर जावे लागले होते. मात्र फलंदाजी करण्यासाठी त्याने पुनरागमन केले. रोहित काही तास मैदानाच्या बाहेर थांबल्यानंतर भारतासाठी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सामन्याच्या शेवटच्या षटकात चाहत्यांना रोहित शर्मा विरुद्ध मुस्तफिजूर रहमान असा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. विजयासाठी भारताला शेवटच्या दोन चेंडूंवर १२ धावांची आवश्यकता होती. रोहितने पाचव्या चेंडूवर षटकार कुटला, मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही.

२७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट (५), धवन (८) व वॉशिंग्टन सुंदर ( ११) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु लोकेश १४ धावांवर पायचीत झाला. श्रेयस अय्यरने अक्षर पटेल सोबत पाचव्या विकेटसाठी शतकी धावा जोडल्या. श्रेयस- अक्षरची १०७ धावांची भागीदारी मेहिदी हसनने तोडली. १०२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८२ धाव करणाऱ्या श्रेयसचा आफिफ होसैनने अप्रतिम झेल टिपला. बांगलादेशने गोलंदाजीत बदल केला आणि इबादत होसैनने भारताचा सेट फलंदाज अक्षरला (५६) बाद केले.

भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले. बोट दुखत असूनही रोहितने ४६व्या षटकात इबादतला ६,६,४ असे धुतले.

तत्पूर्वी, मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या बांगलादेशसाठी त्यांचे सलामीवीर फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. सलामीला आलेला अनामुल हक आणि लिटन दार यांनी अनुक्रमे ११ आणि ७ धावांची खेळी केली. महमदुल्लाह याने ७७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर मेहदी हसन मिराज याने पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली. हसनने बांगलादेशसाठी सर्वाधिक १०० धावा केल्या.

भारतीय गोलंदाजी विभागाचा विचार केला तर, वॉशिंगटन सुंदर किफायतशीर ठरला. सुंदरने १० षटकांमध्ये ३७ धावा खर्च करून सर्वात जास्त तीन विकेट्स घेतल्या. भारताचा युवा वेगावन गोलंदाज उमरान मलिक याला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. मलिकने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. यादरम्यान, त्याने ५८ धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराज मागच्या काही सामन्यांनंतर भारताचा एक चांगला वनडे गोलंदाज म्हणून समोर आला आहे. मात्र या सामन्यात तो संघाला चांगलाच महागात पडला. सिराजने दोन विकेट्स घेतल्या, पण यादरम्यान तब्बल ७३ धावा खर्च केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd odi rohit sharmas fight fails bangladesh beat india by 5 runs 2 0 lead in the series
First published on: 07-12-2022 at 20:05 IST