भारत आणि इंग्लंडदरम्यान ओव्हलवर सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्कारली. त्यामुळे त्यांना सर्वबाद ११० धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धुमाकूळ घालत एकट्याने सहा बळी घेतले.

भारत विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडची सर्वात खराब सुरुवात झाली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात जेसन रॉय आणि जो रूट यांना शून्यावर बाद केले. त्यानंतर त्याने जॉनी बेअरस्टोला सात धावांवर तंबूत धाडले. लियाम लिव्हिंगस्टोनचा त्याचा चौथा बळी ठरला. डेव्हिड विली आणि ब्रायडन कार्ससुद्धा बुमराहचे शिकार ठरले. बुमराहने ७.२ षटकांमध्ये केवळ १९ धावा देऊन सहा बळी घेतले.

या दरम्यान जसप्रीत बुमराहने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरा ‘फाइव्ह विकेट हॉल’ पूर्ण केला. ओव्हलमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात पाच बळी घेणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने तीन बळी घेऊन बुमराहला खंबीर साथ दिली.