IND vs ENG T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपली असून उद्यापासून (७ जुलै) टी २० मालिका सुरू होणार आहे. ७ जुलै ते १० जुलै या कालावधी दरम्यान चालणाऱ्या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामन्याच्या वेळेमुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. याशिवाय, सामन्याचे प्रसारकही याबाबत फारचे समाधानी नसल्याचे चित्र आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी २० सामना गुरुवारी साउथॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. ही टी २० मालिका सुरु होण्यापूर्वी पहिल्या सामन्याची वेळ चर्चेचा विषय ठरली आहे. पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी चाहत्यांना साधारण तीन वाजेपर्यंत जागे रहावे लागेल. त्यामुळे जाहिरातदार, प्रसारक आणि भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: ‘बेझबॉल’ धोरण म्हणजे काय?; तीन दिवस पराभवच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडने सामना जिंकलाच कसा?

सहसा भारतीय क्रिकेट संघ जे सामने खेळतो ते सर्व भारतीय वेळेनुसार आणि चाहत्यांच्या सोयीनुसार आयोजित केले जातात. पण, भारत विरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या टी २० सामन्याबाबत असे झाले नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

हेही वाचा – ‘या’ बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते! मायकल वॉनच्या हातून ट्रॉफी स्वीकारणाऱ्या खेळाडूला ओळखलं का?

टी २० मालिकेचे भारतातील अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क देखील पहिल्या सामन्याच्या वेळेबद्दल फारसे समाधानी नाही. अत्यंत विचित्र वेळेत सामना सुरू होत असल्यामुळे जाहिरातदार स्वारस्य दाखवणार नाहीत. याचा फटका प्रसारकांना बसण्याची शक्यता आहे.