इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला, दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत बरोबरी साधली. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने जोरदार कमबॅक करत इंग्लंडला पराभूत केलं आणि मालिकेत २-१ आघाडी घेतली. इंग्लंडसाठी पाच कसोटी सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असं असताना आता पाचव्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार आहे. भारतीय संघाचे सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरूण आणि आर. श्रीधर यांना करोनाची लागण झाली आहे. या तिघांना लंडनमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या तिघांना चौथ्या कसोटीला मुकावं लागलं होतं.

चौथ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय संघातील खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. त्यामुळे करोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चौथ्या कसोटीवेळी बहुतेक खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. गेल्या आठवड्यात सपोर्ट स्टाफची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती.

Video: काय, मी वर्ल्डकपसाठी सिलेक्ट झालोय? विश्वास न बसल्याने मैदानातून थेट ड्रेसिंगरुममध्ये जात फोनवरुन त्याने केलं कन्फर्म

१९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार असल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे. जर खेळाडूंना करोनाची लागण झाली तर आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान पाचवा कसोटी सामन्यापूर्वीचा संघ सराव रद्द करण्यात आला आहे. खेळाडूंनाा रुममधून बाहेर पडू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.