भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांच्या दोन मालिका भारताला खेळायच्या आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला कोविड १९ची लागण झाली होती. त्यामुळे तो निर्णायक कसोटीतून बाहेर पडला होता. काही दिवस विलगीकरणात राहिलेल्या रोहितचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या टी २० मालिकेत खेळू शकतो.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा विलगीकरणातून बाहेर आला आहे. मात्र, तरीदेखील नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यात तो खेळू शकलेला नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार, “रोहितची चाचणी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. वैद्यकीय निकषांनुसार तो आता विलगीकरणातून बाहेर आला आहे. पण, तो नॉर्थहॅम्प्टनशायरविरुद्धचा आजचा टी२० सराव सामना खेळत नाही. कारण, त्याला पहिल्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यापूर्वी पुरेशा विश्रांतीची गरज आहे.”

हेही वाचा – IND vs ENG Edgbaston Test : अँडरसनच्या टोमणेबाजीला रविंद्र जडेजाचे सडेतोड उत्तर

एजबस्टन येथे सुरू असलेला कसोटी सामना संपल्यानंतर ७ जुलैपासून भारत आणि इंग्लंडची तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू होणार आहे. सध्या आर्यलंडला टी २० सामने खेळण्यासाठी गेलेला संघ इंग्लंडला बोलवण्यात आला आहे. हा संघ दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली सराव सामने खेळण्यात व्यग्र आहे. टी २० मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा ठिक झाल्यामुळे तो या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल.