IND vs ENG 5th Test : गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यातील पाचवा सामना करोनाच्या संकटकामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे १५वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) या जोडीने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून नेला.

आज (५ जुलै) सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा (६६) आणि ऋषभ पंत (५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत विजय मिळवला. इंग्लंडच्यावतीने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रीज मैदानावर झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर झालेला दुसरा सामना भारताना १५१ धावांनी जिंकला होता. मालिकेतील तिसरा सामना लीड्मधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर झाला होता. यजमान इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातला होता. मात्र, केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने जोरदार मुसंडी मारत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. १५७ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघात करोनाने प्रवेश केल्यामुळे पाच सामन्यांची मालिका अर्धवट सोडून खेळाडूंना मायदेशी परतावे लागले होते.

पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली होती. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीमुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावा करणे शक्य झाले होते. जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.

हेही वाचा – Wimbledon 2022 : सानिया मिर्झाची मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक; भारताच्या आशा पल्लवित

या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले होते.

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आले होते. दुसरीकडे, इंग्लंडच्या कसोटी संघालादेखील बेन स्टोक्सच्या रुपात नवीन कर्णधार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळत होते.