न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-० ने जिंकत भारतीय संघाने नवीन इतिहास घडवला. मात्र या सामन्यात काही खेळाडूंनी निराश केलं. युवा फलंदाज संजू सॅमसनला अखेरच्या सामन्यात रोहित शर्माऐवजी सलामीला येण्याची संधी देण्यात आली, मात्र केवळ दोन धावा काढत सॅमसन माघारी परतला. सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला अपयश आलं. मात्र क्षेत्ररक्षणात सॅमसनने आपलं १०० टक्के योगदान देत स्वतःची निवड सार्थ ठरवली.

मुंबईकर शार्दुल ठाकूर सामन्यातलं आठवं षटक टाकत होता. रॉस टेलरने या षटकात एक टोलेजंग फटका लगावला. हा फटका पाहिल्यानंतर प्रत्येकाने चेंडू सीमारेषेपार जाणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र सीमारेषेवर उभ्या असलेल्या संजू सॅमसनने हवेत उडी मारत चेंडू आत ढकलला आणि संघासाठी उपयुक्त अश्या ४ धावा वाचवल्या. संजूच्या या भन्नाट क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.