मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने वानखेडेवर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम केला. त्याने पहिल्या डावात १० विकेट घेत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. एजाजने हा विक्रम रचताच अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीने न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये जात एजाजच्या कामगिरीला दाद दिली.

विराटने एजाजसाठी केलेली ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विराटव्यतिरिक्त भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही एजाजचे अभिनंदन केले. भारताच्या पहिल्या डावात एजाजने ४७.५ षटकात ११९ धावा देत १० बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दुर्मिळ कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे यांच्याशी बरोबरी केली. या शानदार कामगिरीनंतर त्याच्यावर चौफेर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा – IND vs NZ : खरं की काय..! मायभूमीत पराक्रम करणाऱ्या एजाज पटेलला आपल्याकडं वळवणार मुंबई इंडियन्स?

१९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा त्याने मोडीत काढला. एजाज हा जन्माने मुंबईकर आहे.

या कामगिरीनंतर एजाज म्हणाला, “ही कामगिरी फक्त मुंबईतच व्हावी, असे माझ्या नशिबात होते. खर सांगायचे तर हे स्वप्नासारखे आहे. माझ्यासाठीच नाही, तर माझ्या कुटुंबासाठीही हा खूप खास प्रसंग आहे.” १९९६मध्ये एजाज मुंबई सोडून न्यूझीलंडला गेला आणि तिथेच स्थायिक झाला.