Commonwealth Games 2022 : येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी ७२ देशांतील जवळपास चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.

१९९८च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस ‘अ’ गटामध्ये आहे. तर, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका ‘ब’ गटामध्ये आहेत.

हेही वाचा – CWG 2022 : राष्ट्रकुल खेळांपूर्वी मिताली राजचे भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाली “आपल्या मुली…”

या दोन्ही गटातील पहिल्या दोन स्थानांवर असणारे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील पहिला क्रिकेट सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने खेळवले जातील.

हेही वाचा – Rishabh Pant : युवराज सिंगच्या ‘त्या’ ट्वीटला ऋषभ पंतने मोजक्या शब्दांत दिले उत्तर, म्हणाला…

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. सामना सुरू असताना मैदानावर आणि मैदानाबाहेरही जोशपूर्ण वातावरण तयार होते. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाही. त्यामुळे दोन्ही संघाची गाठ फक्त आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धांमध्येच पडत असते. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून स्मृती मंधानाकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे.