विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे. मात्र त्याचबरोबर जगातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये समावेश असणाऱ्या विराट कोहलीही या सामन्यामध्ये वाँडर्सच्या मैदानावर एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी आहे तर विराटचा विक्रमही अवघ्या सात धावांवर आहे. जोहान्सबर्गमधील वाँडर्सच्या मैदानावर कोहलीकडून नव्या वर्षांत नेतृत्व आणि फलंदाजीत अधिक चमक दाखवण्याची अपेक्षा आहे. वाँडर्स येथील कसोटी भारताने जिंकली, तर सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी येईल. त्याशिवाय वाँडर्सवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरण्यासाठी कोहलीला अवघ्या सात धावांची आवश्यकता आहे. २०१८ मध्ये वाँडर्सवरच भारताने वेगवान माऱ्याच्या बळावर आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकून सर्वोत्तम संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. कोहलीने वाँडर्सच्या मैदानामध्ये दोन कसोटी सामन्यांमध्ये ३१० धावा केल्यात. या मैदानामध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या जॉन रीडला ओळखलं जातं. त्याने या मैदानावर ३१६ धावा केल्यात. त्यामुळेच आता सात धावा करुन विराट रीडला मागे टाकून हा विक्रम आपल्या नावे करु शकतो. या मैदानामध्ये कसोटी सामने खेळता सर्वाधिक धावा या दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिसने केल्यात. या मैदानात कॅलिसने तब्बल एक हजार १४८ धावा केल्या आहेत. ३३ वर्षीय कोहलीकडे सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे सोडण्याची संखी या सामन्यात आहेत. द्रविडने दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या सर्वकालीन फलंदाजीच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. द्रवीडने ११ कसोटी सामन्यांमध्ये ६२४ धावा दक्षिण आफ्रिकेत केल्यात. कोहलीने या देशात खेळलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये ६११ धावा केल्यात. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी असून त्याने एकूण एक हजार ११८ धावा दक्षिण आफ्रिकेतील मैदानांमध्ये कसोटी खेळताना केल्यात. भारतीय संघ यापूर्वी या मैदानावर २०१८ साली कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी भारताने यजमान संघाला ६३ धावांनी पराभूत केलेलं. या सामन्यात विराटने अर्थशतक साजरं केलं होतं. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्याने दोन्ही डावांमध्ये ६३ धावांच्या मोबदल्यात सात विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराहने एकूण ७ विकेट्स घेतलेल्या.