भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका रविवारी पार पडली. ही मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने जिंकली. या मालिकेती सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते कोहली आणि सिराजला मालिकावीराचा पुरस्कार संयुक्तपणे द्यायला हवा होता. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली. तसेच या कालावधीत तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. दुसरीकडे, मोहम्मद सिराजच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने एकूण ९ विकेट घेतल्या, संपूर्ण मालिकेत सिराजची कामगिरी उत्कृष्ट होती. मला माहित आहे नेहमी फलंदाजांना मालिकेतील सर्वोत्तम पुरस्कार दिला जातो, परंतु सिराज पूर्णपणे अपवादात्मक होता, असे गंभीरला वाटते. गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, ''तो (मोहम्मद सिराज) विराट कोहलीच्या बरोबरीचा होता. तो संयुक्त मॅन ऑफ द सिरीज असावा. तो अपवादात्मक होता आणि त्याचे शानदार स्पेल फलंदाजीतील विकेट्सवर आले. मला माहित आहे की तुम्हाला नेहमी फलंदाजांना मालिकेतील सर्वोत्तम पुरस्कार देण्याचा मोह होतो, परंतु सिराज पूर्णपणे अपवादात्मक होता. प्रत्येक गेममध्ये तो टोन सेट करण्यात सक्षम होता. तो भविष्यातील खेळाडू आहे आणि प्रत्येक मालिकेत तो अधिक चांगला होत आहे.'' हेही वाचा - FIFA’s Disciplinary Committee: लिओनेल मेस्सीच्या संघावर होणार कारवाई! फिफाने सुरु केली ‘त्या’ अश्लील कृतीची चौकशी मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये सिराजने दोन विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत सिराजने तीन विकेट घेतल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजाने चार विकेट घेत कामगिरीत आणखी सुधारणा केली. या मालिकेदरम्यान सिराजच्या खात्यात एकूण ९ विकेट आल्या आणि त्याची इकॉनॉमी ४ च्या आसपास होती. हेही वाचा - WIPL Media Rights: बीसीसीआय पुन्हा एकदा मालामाल; महिला आयपीएल मीडिया हक्कांमधून कमावला अब्जावधींचा गल्ला सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली (१६६*) आणि शुबमन गिल (११६) यांच्या उत्कृष्ट शतकांच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ३९० धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या ७३ धावांवर गारद झाला. पाहुण्यांसाठी केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. यादरम्यान भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराज चमकला, त्याने ४ विकेट घेतल्या, तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.