IND vs WI T20 Series : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध टी २० मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाले. रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक टी २० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर या खेळाडूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफने हॉटेलच्या लॉबीमध्ये एकमेकांच्या गळाभेटी घेतल्याचे दिसत आहे.

सध्या शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ कॅरेबियन बेटांवर एकदिवसीय मालिका खेळत आहे. एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा इतर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. हे खेळाडू २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी २० मालिकेत खेळणार आहेत. त्यासाठी ते वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाले. कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडू हॉटेलमध्ये दाखल होताच संघातील सपोर्ट स्टाफने आणि काही खेळाडूंनी त्यांची भेट घेतली.

टी २० विश्वचषक बघता ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. वेस्ट इंडीजचा संघ टी २० मध्ये धोकादायक संघ मानला जातो. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचा संघ टी भारताला जास्तीत जास्त स्पर्धा देईल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय टी २०मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण २०वेळा समोरसमोर आले आहेत. यापैकी भारताने १३ तर, वेस्ट इंडिजने सहा सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – “मी सेहवाग किंवा सचिन बनू शकणार नाही, याची मला जाणीव होती”, भारतीय प्रशिक्षकाने केला खुलासा

टी २० मालिकेसाठी भारतीय चमू – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.