भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याला पावसाचा फटका बसला. गयाना येथे सुरु असलेल्या पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचांनी खेळपट्टीची पाहणी करत मैदान खेळण्यायोग्य असल्याचं जाहीर केलं. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र सहाव्या षटकातच सामन्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. काही क्षणांनी पावसाचा जोर ओसरल्यानंतर खेळाडू काहीकाळासाठी मैदानात उतरले होते. मात्र मैदानातील एक भाग पावसामुळे ओला राहिल्याचं विराटने पंचांच्या निदर्शनास आणून दिलं. मैदानातील कर्मचारी हा भाग सुकवण्याचं काम करत असताना विराटने मैदानावर सुरु असलेल्या संगीताच्या ठेकावर ताल धरला. यावेळी विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही विराटला साथ दिली.

मैदानातील कर्मचाऱ्यांनी ओला भाग सुकवण्याचं काम केल्यानंतर, पंचांनी वाया गेलेला वेळ लक्षात घेऊन डकवर्थ लुईस नियमानुसार सामना ३४ षटकांचा खेळवण्यात येईल अशी घोषणा केली.