पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे अध्यक्ष झाल्यापासून रमीझ राजा सक्रिय शैलीत दिसत आहेत. अशातच इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत हा आमच्या निशाण्यावर असेल, असे राजा यांनी अलिकडे म्हटले होते, आता त्यांनी भारतीय संघांबाबत नवीन प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजा म्हणाले, ”टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नेहमीच पाकिस्तान क्रिकेटबद्दल आवड आहे आणि भारतीय संघाने भूतकाळातून पाकिस्तान संघाची चांगली रणनीती स्वीकारली आहे. भारताने पाकिस्तान संघाच्या सर्व चांगल्या धोरणांचा अवलंब केला आहे. पाकिस्तानचा प्रभाव नेहमीच शास्त्रींवर होता, त्यामुळे हे घडणार होते. आम्ही खूप मेहनती आणि समर्पित खेळाडू होतो, आम्ही कमी प्रतिभावान खेळाडूंना १०० टक्के घेऊन जायचो आणि पराभव स्वीकारत नव्हतो.”

हेही वाचा – RCB vs CSK : “मी त्याला माझा भाऊ मानतो, पण तो…”, महेंद्रसिंह धोनीचं वक्तव्य चर्चेत

राजा म्हणाले, ”भारतानेही आपले मॉडेल बदलले आहे आणि कौशल्यावर खूप काम केले आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची पातळी खूप सुधारली आहे. यामुळे त्याच्या सर्व शंका दूर झाल्या. ती पातळी गाठण्यासाठी आपल्याला पुढील तीन ते चार वर्षात खूप काम करावे लागेल.”

न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानची देशांतर्गत राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून खेळाडू उत्साही दिसत आहेत. पीसीबी चेअरमन बनताच रमीझ राजा यांनी खेळाडूंच्या पगारात वाढ केली.

राष्ट्रीय टी-२० स्पर्धा पाकिस्तानी संघाला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाची ठरू शकते. टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २४ ऑक्टोबर रोजी होणार असून या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल.