टी२० विश्वचषकाला जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या नसल्याने भारतीय संघ हा कमकुवत झालं आहे असे काही जणांचे मत आहे. मात्र रवी शास्त्री यांनी त्यांच्या अनुपस्थितीत देखील भारत विश्वचषक जिंकू शकतो असे म्हटले. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत बुमराह आणि जडेजा संघासाठी उपलब्ध नसल्यामुळे त्याचे नुकसान होताना नक्कीच दिसू शकते. परंतु भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र या अडचणीच्या काळात देखील संधी शोधता येईल, असे वाटते.

माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा टी२० विश्वचषक खेळणार नसले तरी, यादरम्यानच्या काळात भारताला एखादा नवीन खेळाडू मिळू शकतो, ज्याच्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्याची क्षमता असेल. टी२० विश्वचषक येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला देखील आहे. बुमराहचा बदली खेळाडू अद्याप निश्चित केला गेला नाहीये. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बुमराहच्या जागी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे जडेजाच्या जागी अक्षर पटेल याला विश्वचषक संघात निवडले गेले आहे.

हेही वाचा :  Sourav Ganguly: सौरव गांगुली राजीनामा देण्याच्या तयारीत, बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष 

प्रसारमाध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले, “हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, एवढे क्रिकेट खेळले जात आहे आणि खेळाडूंना दुखापत होत आहे. बुमराह दुखापतग्रस्त आहे, पण ही दुसऱ्या एखाद्यासाठी संधी असू शकते. दुखापत झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.” शास्त्री पुढे असे म्हणतात की, “मला वाटते आपल्याकडे पुरेस राखीव खेळाडू आहेत आणि आपल्याकडे एक चांगला संघ आहे. मला नेहमीच वाटते की, जर तुम्ही उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचलात, तर ही स्पर्धा कुणाचीही होऊ शकते. प्रयत्न चांगली सुरुवात करण्याचा, उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याचा आणि शक्यतो सर्वांना माहिती आहे की, विश्वचषक जिंकण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी ताकद आहे. बुमराह संघात नसने, जडेजा संघात नसने अडचणीची बाब आहे. पण ही नवीन चॅम्पियनला शोधण्याची संधी देखील आहे,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.