भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, 2018 साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही वन-डे सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेवर अन्याय करत असल्याचं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राशी बोलत होते.

“अजिंक्य रहाणेकडे दुर्लक्ष करुन भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर अन्याय करतय. इंग्लंडमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे, याचसोबत तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. अजिंक्य भारतीय संघात सलामीला आणि चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी करु शकतो. मधल्या फळीत त्याचा अनुभव भारतीय संघासाठी कामाला येऊ शकतो.” अंबाती रायुडू गेल्या काही सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण येणार हा प्रश्न अजुनही कायम आहे.

अवश्य वाचा – मराठमोळा अजिंक्य पोहचला शेतकऱ्याच्या बांधावर; म्हणाला तुमच्यामुळे सुखाचे घास घेतोय !

“अजिंक्य गरजेच्या वेळी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करत, भारतीय संघाचा डावही तितकाच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. हा टी-20 विश्वचषक नाहीये. इकडे गरजेच्या वेळी तुमच्या संघाचा डाव सावरणंही तितकच महत्वाचं असतं. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला किमान 280 धावांपर्यंतची धावसंख्या उभारावी लागणार आहे.” वेंगसरकर अजिंक्यच्या फलंदाजीविषयी बोलत होते. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूला भारतीय संघात जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.