भारतीय संघाला यंदाच्या मोसमात संमिश्र यश मिळत असले तरी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी त्यांना विजेतेपदाची संधी आहे, असे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने सांगितले.

भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना लारा म्हणाला, ‘‘घरच्या मैदानावरील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करीत असतो. २०११च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सनसनाटी कामगिरी केली होती. भारतीय संघात वैविध्यता लाभलेले खेळाडू आहेत. त्यांच्या जोरावर भारतीय संघ सामन्यास कलाटणी देऊ शकतो.’’

‘‘घरच्या मैदानावर खेळतानाही प्रेक्षकांचे जास्त दडपण असते, मात्र त्यांना अशा दडपणाची सवय आहे. हे लक्षात घेऊन ते विश्वचषक जिंकू शकतील असा मला विश्वास आहे,’’ असेही लाराने सांगितले.