महेंद्रसिंग धोनीच्या युवा ब्रिगेडने चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली आणि साऱ्यांनीच त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. यामध्ये भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडही कुठे मागे नाही. ‘सध्याच्या भारतीय संघात योग्य समतोल असल्यामुळेच त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आली,’ अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.
स्पर्धेतील भारत हा सर्वोत्तम संघ होता. निर्णायक क्षणांच्या वेळी ते डगमगले नाहीत. दोन्ही डावांमध्ये काही क्षण असे आले, की जिथे काय करावे आणि काय नाही, हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण भारतीय खेळाडू या परिस्थितीमध्ये डगमगले नाहीत. त्यांनी शांतपणे या परिस्थितीतून मार्ग काढला. फलंदाजी करताना कोहली आणि जडेजा यांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली, तर भारताची गोलंदाजीही भेदक होती. एकंदरीत हा दिवस त्यांचाच होता, असे द्रविड म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, इंग्लंडमधले वातावरण हे आव्हानात्मक होते, पण भारतीय संघात योग्य समतोल असल्यानेच त्यांना जेतेपद पटकावता आले. भारताकडे सात फलंदाज होते, तर तीन वेगवान गोलंदाजांसह दोन फिरकीपटूही होते. फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच भारताचे क्षेत्ररक्षण या स्पर्धेत कमालीचे उंचावलेले होते. मैदानात खेळाडूंची ऊर्जा ही नक्कीच वाखाणण्याजोगी होती. या साऱ्याचे श्रेय खेळाडू, प्रशिक्षक आणि त्याचबरोबर निवड समितीलाही द्यायला हवे.