नवी मुंबई : भारतीय महिला संघाला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले. यजमान भारताला या सामन्यात गोलच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने आक्रमक खेळ केला. त्यांना गोल करण्यासाठी दोन उत्तम संधी मिळाल्या, ज्यापैकी एक फटका क्रॉसबारलाही लागला. यानंतर मात्र भारताने दमदार पुनरागमन करताना सकारात्मक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी इराणची बचाव फळी आणि गोलरक्षक यांच्यावर दडपण टाकले. त्यांनी छोटे-छोटे पास करतानाच चांगले क्रॉसही केले. ७६व्या मिनिटाला राखीव फळीतील डांगमे ग्रेसला गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. मात्र, तिने हेडरमार्फत मारलेला फटका इराणची गोलरक्षक झोहरे कुंडेइने अप्रतिमरित्या अडवला. त्यामुळे भारताला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. अ-गटात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाचा दुसरा साखळी सामना रविवारी चायनीज तैपेइविरुद्ध रंगणार आहे.