क्रिकेट विश्वाला ज्याची उत्सुकता होती, ती विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०१७ पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बैठकीमध्ये घेतला. पहिल्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान इंग्लंडला मिळाला असून २०२१ साली दुसरी स्पर्धा भारतात भरवण्यात येणार आहे. २०२३ विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आले.
‘‘कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०१७ पासून सुरू करून पहिल्यांदा इंग्लंडमध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही स्पर्धा जून किंवा जुलै महिन्यात होईल; तर भारतात ही स्पर्धा २०२१ साली फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेण्यात येईल,’’ असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.
आयसीसीचे भविष्यातील
मुख्य कार्यक्रम
ट्वेन्टी-२० विश्वचषक २०१६ – भारत
विश्व कसोटी अजिंक्यपद २०१७ – इंग्लंड India,
क्रिकेट विश्वचषक २०१९ – इंग्लंड
ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२० – ऑस्ट्रेलिया
विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१ – भारत
क्रिकेट विश्वचषक २०२३ – भारत
आयसीसीच्या अन्य स्पर्धाचा कार्यक्रम
१९ वर्षांखालील विश्वचषक २०१६- बांगलादेश
महिलांचा विश्वचषक २०१७ – इंग्लंड
१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ -न्यूझीलंड
महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक २०१८ – वेस्ट इंडिज
महिलांचा विश्वचषक २०२१- न्यूझीलंड
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२२- वेस्ट इंडिज
महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२२- द. आफ्रिका
चेंडू बदलल्यास पाच धावांचा दंड
जर फलंदाजी करणाऱ्या संघाने चेंडू बदलला आणि त्याची माहिती गोलंदाजी करणाऱ्या संघाला दिली नाही, तर त्यांना पाच धावांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. चॅम्पियन्स करंडकामध्ये इंग्लंविरूद्धच्या सामन्यात श्रीलंकेने चेंडू बदलला होता आणि याची कल्पना इंग्लंडला दिली नव्हती.
‘डीआरएस’वर निर्णय नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या प्रणालीच्या (डीआरएस)विरोधात असून आयसीसीच्या बैठकीमध्येही त्यांचाच विजय झाल्याचे पाहायला मिळाले. डीआरएसवर आयसीसीकडून जास्त चर्चा झाली नाही आणि पुन्हा एकदा याची सक्ती होणार नसल्याचेच चित्र आहे.