कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 6 गडी राखून भारताने अखेरचा टी-20 सामना आपल्या खिशात घातला. विराटने सामन्यात नाबाद 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन - रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. दिनेश कार्तिकने विराटला पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचायला मदत करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याआधी, फिरकीपटू कृणाल पांड्याने टिच्चून मारा करत अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखलं. कृणाल पांड्याने सामन्यात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिंच आणि डार्सी शॉर्टने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली. यानंतर अष्टपैलू कृणाल पांड्याने कांगारुंच्या उर्वरित फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. ठराविक अंतराने कृणालने कांगारुंच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ काहीसा अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी महत्वाच्या क्षणी करत संघाला महत्वाच्या धावा जमवून दिल्या. याचसोबत आज भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. अनेक सोपे फटके भारतीय क्षेत्ररक्षकांना अडवता आले नाहीत, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुरेपूर घेतला.