विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डावाची अक्षरशः घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवशी हे फलंदाज भारताची आघाडी कितीने वाढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अवश्य वाचा - न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या डावातही विराट सपशेल अपयशी दरम्यान दुसऱ्या डावातही भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने पायचीत बळी घेत त्याला माघारी धाडलं. यानंतर टीम इंडियाला लागलेली गळती काहीकेल्या थांबलीच नाही. पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे भारताचे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हवामानाचा पुरेपूर फायदा घेत चेंडू हवेत वळवले. अजिंक्य-चेतेश्वर पुजारा यांची विकेट पाहण्यासारखी होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा प्रतिकार करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अवश्य वाचा - Video : रविंद्र जाडेजाचा हा भन्नाट झेल पाहिलात का? त्याआधी, सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ५ गडी गमावले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत ४९ धावा केल्या. दिवसाच्या सुरुवातीला, टॉम ब्लंडलला माघारी धाडत उमेश यादवने दुसऱ्या दिवशी भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ब्लंडल आणि लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. यानंतर मैदानात आलेला कर्णधार विल्यमसनही स्वस्तात माघारी परतला. यानंतर न्यूझीलंडने सर्व प्रथितयश फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. भारतीय गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर शिस्तबद्ध मारा केल्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करणं कठीण जात होतं. दुसऱ्या सत्रातही बुमराहने वॉटलिंग आणि साऊदी यांना एकाच षटकात माघारी धाडलं. मात्र यानंतर तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. जेमिसन-वँगर आणि डी-ग्रँडहोम या त्रिकुटकाने फटकेबाजी करत धावा जमवण्यास सुरुवात केली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या जिवदानाचाही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फायदा घेतला. मात्र पहिल्या डावात न्यूझीलंड आघाडी घेणार असं वाटत असतानाच, मोहम्मद शमीने जेमिसनला माघारी धाडत न्यूझीलंडचा डाव संपवला. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, रविंद्र जाडेजाने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.